35 Marathi bodh katha -सुंदर मराठी बोधकथा योग्य तात्पर्या सहित- moral stories in marathi

लहान मुलांसाठी खास 35 सहज सोप्या सुंदर गोष्टी -moral stories for students in marathi


मराठी बोध कथा


35 सुंदर मराठी बोधकथा  तात्पर्या सहित- marathi bodh katha tatparya


marathi bodh katha- आम्ही लहान मुलांसाठी खास सहज सोप्या आणि सुंदर मराठी बोधकथा  लहान मुलांना समजेल अशा सोप्या भाषेत लिहिली आहे. प्रत्येक मराठी बोधकथा तात्पर्य marathi bodh katha tatparya सहित सुंदर चित्रे जोडून सादर केली आहे जेणेकरून लहान मुलांना वाचायला आणि समजायला मदत होईल. प्रत्येक बोधकथेतून मुले नवीन काहीतरी शिकतील. बहयाजगाबद्दल अधिक ज्ञान प्राप्त करतील मराठी बोधकथे चे  तात्पर्य त्यांना जीवणविषयक नवीन शिक्षण देईल 


on this page, you will fins some simple marathi moral stories- marathi bodh katha. we provided accurate and appropriate moral to each and every story- marathi Bodh Katha ttatparya.


we added some unique pictures to give you the best experience. all the moral stories motivate the student to learn new things and helps them to understand the outer world- moral stories for students in marathi.



1. marathi bodh katha- लालची राजा 

लालची राजाची ही मराठी बोधकथा सर्वांच्या परीचयाची आहे

 
खूप खूप वर्षा पूर्वी मिडास नावाचा एक राजा होता . त्याला एक मुलगी होती.त्याची प्रजा खूप दुःखी होती कारण त्याला सोन्याचा फार हव्यास होता . 

सोने मिळवण्यासाठी काय वाटेल ते करायला तो तयार होता. आपल्या प्रजाजनांचीही लूट करून तो त्यांच्याकडून सोने हिरावून घेत असे .

 एक दिवस अचानक त्याला देवाचे दर्शन झाले . देवाने त्याला सांगितले , “ तू सोन्याचा हव्यास सोडून दे . त्याने तू ही दुःखी होशील आणि तुझी प्रजाही दुःखी होईल . "

 पण मिडासने हे ऐकले नाही . तो देवाला , म्हणाला , " मला असे वरदान दे कि मी ज्या वस्तूला स्पर्श करेन ती सोन्याची होईल . "

 देवाने पुन्हा पुन्हा राजाला धोक्याचा इशारा दिला. पण राजाचा हट्ट कायम होता . तेव्हा देवाने तसा वर मिडासला दिला व तो अदृष्य झाला .

 दिवसभर मिडास राजा घरातल्या प्रत्येक वस्तूला स्पर्श करून सोने बनवण्यात मग्न होता . त्याला तहान भुकेचीही आठवण राहिली नाही . 

शेवटी राणीने खूप आग्रह करून त्याला जेवायला बसवले . पण त्याला जेवताच येईना . तो ज्या पदार्थाला स्पर्श करी , तो सोन्याचा होई . खाणार काय अशी परिस्थिती झाली राजाची?

त्याची राणी व राजकन्या त्याच्याजवळ आल्या . पण मिडासने स्पर्श केल्याबरोबर त्यांचेही रूपांतर सोन्याच्या पुतळ्यात झाले . आता मात्र मिडासला पूर्ण कल्पना आली कि हा वर किती भयंकर आहे . 

भुकेने आणि प्रियजनांच्या विरहाच्या दुःखाने तो वेडापिसा होऊन गेला . त्याला पश्चाताप झाला . पण त्याचा आता काय उपयोग होता ? 

शेवटी त्याने पुन्हा देवाची आराधना केली.देव पुन्हा आला आणि राजाने देवाची माफी मागीतिली.देवाने सर्व पूर्ववत केले.आता राजा सोन्याचा विचार ही करत नाही.

मराठी बोधकथा तात्पर्य : अतिहव्यास हा विनाशालाच निमंत्रण देतो . त्यामुळे जे मिळेल त्यात सुखी राहावे. जास्तीची अपेक्षा विनाशच करते.

2.marathi bodh katha हुशार कोंबडी बोधकथा

हुशार कोंबडीने चतुराईने आपले प्राण कसे वाचवले- वाचा ही भन्नाट मराठी बोधकथा 

आज मी तुम्हाला एक कोल्हा आणि कोंबडी ची बोधकथा सांगणार आहे. कोंबडी कशी कोल्ह्याची फजिती करते हे तुम्हाला या छोट्याश्या बोधकथेतून समजेल.

एकदा एक भुकेला कोल्हा एका खोपटात शिरून काही तरी खायला मिळविण्याच्या शोधात असता एक कोंबडी त्याच्या दृष्टीस पडली. पण ती उंच माळ्यावर बसली होती. त्यामुळे तिच्याजवळ त्याला जाता येईना. 

मग तिला युक्तीने खाली आणून मारून खावी या हेतूने कोल्हा तिला म्हणाला, ‘कोंबडीताई तुझी हाल हवाल कशी आहे? तू बरेच दिवस आजारी असून घरातच निजून असतेस असं समजलं. तेव्हापासून तुझ्या काळजीनं मला झोप येत नव्हती.

 खरंच ताई, आता तू बरी आहेस का? थोडावेळ खाली उतर म्हणजे मी तुझी नाडी तरी पाहीन.’ आणि तुला योग्य औषध उपचार देईल.याप्रमाणे अघळपघळ बोलून कोल्हा तिची स्तुती करीत असतो जेणेकरून कोमाडी खाली येईल आणि तिला खाता येईल 

कोल्हयाचा डाव ओळखून कोंबडी बसल्या जागेवरूनच म्हणाली, ‘खरच भाऊ, तू जी बातमी ऐकली ती अगदी खरी आहे. असा आजार मला कधीही झाला नव्हता. 

मी आता खाली उतरून तुझ्याकडे आले असते, पण माझ्या वैद्याने मला अगदी बजावून सांगितले आहे की, तू आपली जागा सोडून कुठेही जाऊ नकोस.

 कारण अशक्तपणामुळे जागेवरून हालण्याचे श्रम माझ्याने सोसणार नाहीत, आणि म्हणून माझ्यानं खाली येउ शकत नाही. 

आता तू यावेळी जा. सध्या मी इतकी अशक्त आहे की, जर मी उतरून खाली असते तर माझे प्राणच जातील.’त्यामुळे तू लांबूनच माझी तपासणी करून सांग मी त्या प्रकारे काळजी घेईल.

हे ऐकून कोल्हा समजून चुकला की कोंबडी हुशार आहे.आणि तो त्या खोपटातून उदास होऊन बाहेर आला.आणि अश्या प्रकारे कोल्ह्याला उपाशीच जंगलात जावे लागले. कोल्ह्याची झालेली फजिती पाहून कोंबडी मनातल्या मनात हसू लागली.

मराठी बोधकथा तात्पर्य – वाजवीपेक्षा अधिक अगत्य दाखवून एखादा माणूस दुसर्‍याची विनाकारण प्रशंसा करू लागला की, त्या माणसाला काही तरी स्वार्थ साधावयाचा आहे, असे समजून त्याच्या विषयी शक्य तितकी सावधगिरी ठेवावी.


3. marathi bodh katha- गोरा ढग आणि काळा ढग बोधकथा

जो इतरांसाठी जगतो त्यालाच जीवनाचा अर्थ समजतो- वाचा ही सुंदर मराठी बोधकथा 


एकदा आभाळात दोन ढगांची भेट झाली . काळा ढग पाण्याने जड झाला होता . तो हळूहळू जमिनीकडे उतरत येत होता . गोरा ढग अगदी हलका होता . तो उंच आभाळात चढत होता

 भेट झाल्यावर गोऱ्या ढगाने काळ्याला विचारले , “ कुठे चाललास ? " काळा ढग म्हणाला , " जमिनीकडे . मी तिथे जाऊन पाऊस पाडणार आहे . माझ्याजवळ जेवढे पाणी आहे ते सगळे धरणी मातेला देऊन टाकणार आहे .

 जमीन उन्हाने तापली आहे . नद्या , तलाव , विहिरी कोरड्या पडल्या आहेत . झाडेपण सुकून गेली आहेत . शेतकरी आतुरतेने माझी वाट पहात आहेत . 

मला जरा घाईने गेले पाहिजे . " गोरा ढग त्याला हसला . त्याला म्हणाला , 

"वेडाच आहेस . आपली संपत्ती कधी अशी कोणी जगावर उधळून देतो का ? तुझ्यातले पाणी संपले कि तुझे आयुष्यच संपले की ! मी चाललोय स्वर्गात . देव बाप्पाच्या घरी एक जागा रिकामी झालीय . ती मला मिळेल . " 

गोऱ्या ढगाला खूप घाई होती . तो धावतच पुढे निघाला , काळा ढग हळूहळू जमिनीपर्यंत आला . मुसळधार पाऊस झाला . काळा ढग अदृष्यच झाला . 

नद्या , नाले दुथडी भरून वाहू लागले तलाव विहिरी काठोकाठ भरले . सारे रान हिरवेगार झाले . शेतकरी सुखावले . 

गोरा ढग वर जाताना ते पहात होता . काळ्या ढगाच्या वेडेपणाला तो हसला . पाहता पाहता स्वर्गाचा दरवाजा आला . गोऱ्या ढगाने दार ठोठावले . 

एका देवदूताने ते उघडले . त्याने गोऱ्या ढगाला विचारले , " तुझे देवबाप्पाकडे काय काम आहे ? " गोरा ढग आपल्याच तोन्यात होता . तो म्हणाला , " मी इथे रहायलाच आलोय , स्वर्गात १ जागा रिकामी झालीय . 

ती मलाच मिळणार ! उघड दरवाजा . " दार उघडायच्या ऐवजी देवदूताने ते लावूनच घेतले . लावता लावता तो म्हणाला , " ती रिकामी जागा आता भरलीय . 

देवबाप्पा स्वतः विमान घेऊन गेले होते व त्या काळ्या ढगाला स्वर्गात घेऊन आले . ज्याने आपले सर्वस्व देऊन पृथ्वीवर आनंदी आनंद निर्माण केला , त्याच्यापेक्षा आणखी चांगली व्यक्ती कोण असणार ? "

मराठी बोधकथा तात्पर्य : समाजासाठी सर्वस्व समर्पण करणे हाच मोक्ष आहे . आपल्या आजूबाजूच्या सर्वांना सुखी करणे , त्यांना काही न काही मदत करणे यातूनच माणूस सुखी समाधानी होऊ शकतो 



4. marathi bodh katha-स्वामी विवेकानंद आणि एका आज्जीचा अनुभव

स्वामी विवेकानंद यांचे थोरपण दर्शविणारी अप्रतिम मराठी बोधकथा 

स्वामी विवेकानंद आपल्या दिनचर्येत भारत परिक्रमा करत असे. स्वामी विवेकानंद भारत परिक्रमा करत असताना एका छोट्या खेड्यात आले . एका छोट्या झोपडीसमोर येउन त्यांनी पाणी मागितले . घरातून एक म्हातारी बाहेर आली .

 तिने आधी त्यांची चौकशी केली , मग त्यांना घरात बोलावले . एक ग्लासभर दुधात चिमूटभर पूड मिसळून त्यांना दिले . 

नंतर पाणीही दिले . विवेकानंदांनी ते दूध , पाणी प्यायले . तेव्हा ती म्हातारी एकाएकी भावनातिरेकाने रडू लागली . 

स्वामीजींनी तिला रडण्याचे कारण विचारले . ती म्हणाली , “ माझा मुलगा २ वर्षांपूर्वी वारला , त्याची रक्षा गंगेत समर्पण करण्याची माझी फार इच्छा होती . 

पण मला ते शक्य झाले नाही . तू गंगा परिक्रमा करून आला आहेस , तुझ्या शरीरात गंगेच्या पाण्याचा थोडा तरी अंश असेल . 

मी मुलाची चिमूटभर रक्षा दुधात मिसळून तुला दिली . निदान तिथे तरी ती रक्षा गंगेला मिळाली . मी तुला आधी सांगितले नाही , ही फसवणूक झाली.

मी त्याबद्दल तुझी क्षमा मागते . पण आज माझ्या मुलाला मुक्ती मिळाली या आनंदामुळे हे अश्रू आले आहेत .

 यावर स्वामी विवेकानंद ने आजी ला सांगितले की तुमचे योग्य आहे.तुमच्या पुत्राची रक्षा गंगेला मिळाली आहे असेच समजावे.

कारण तुम्ही या वयात काशी वाराणसी ला जाऊ शकत नाही.हे त्यांचे बोल ऐकून अज्जी चे डोळे अजूनच पाणवले.

स्वामी विवेकानंद ची पाठ थोपटत त्यांनी त्यास आशीर्वाद दिला.त्यानंतर स्वामी विवेकानंदांनी आज्जीच्या निरोप घेऊन पुढील तिर्थटनास निघाले.

मराठी बोधकथा तात्पर्य : भारत धर्म प्रधान देश आहे . देश , भाषा , चालीरीती वेगळ्या असल्या तरी प्रत्येकाच्या मनात आपल्या तीर्थासंबंधी अतीव श्रध्दा असते.ती श्रद्धा एका विशिष्ट ठिकाणी आपण जाऊ शकत नसलो तरी मनात भाव असला तरी पूर्ण होते. हेच आमच्या सांस्कृतिक एकतेचे सूत्र आहे .



5. marathi bodh katha-समर्थ रामदास आणि एक कंजूष म्हतारी

समर्थ रामदासांनी कंजूष म्हातारीला जीवनाचा खरा अर्थ समजावला-वाचा ही सुंदर मराठी बोधकथा 


समर्थ रामदास नेहमी या गावातून त्या गावात भ्रमण करत असे.

असेच ते एकदा मावळ प्रांतात भ्रमण करत होते. त्यांनी काही दिवस एका गावात राहण्याचे ठरवले .त्या गावात समर्थ रामदास स्वामी एकेका आळी मध्ये जाऊन पाच घरांत भिक्षा मागत असत . 

एका गावात कोणीतरी सांगितले कि एक म्हातारी एकटी रहाते . ती कधीच कोणाला काही देत नाही . घरी गडगंज धन आहे . पण कुणाला कधी काही मदतही करत नाही .

 समर्थ त्या घरासमोर गेले व भिक्षा मागितली . ती म्हातारी घरातूनच ओरडली , कि मी काही देणार नाही . माझ्याकडे देण्याजोगे काही नाही . 

तरी समर्थांनी प्रयत्न सोडला नाही . ते म्हणाले , " तुझ्याकडे जे काही आहे ते तू दे . मला त्याचे वाईट वाटणार नाही . " आता त्या म्हातारीला खूप राग आला . 

ती पुढे आली व अंगणातली मूठभर माती तिने समर्थांच्या झोळीत टाकली . समर्थांनी आशीर्वाद दिला व ते पुढे गेले . 

असे ३-४ दिवस झाले . तेव्हा त्या म्हातारीने त्यांना विचारले , " मी झोळीत माती टाकली तरी तुम्हाला राग येत नाही ? काय करता तुम्ही या मातीचे ?

 " तेव्हा समर्थ तिला म्हणाले , " तुझ्याकडे देण्याजोगे खूप आहे पण तुझ्याजवळ दानत नाही . कमीत कमी माती तरी देण्याची सवय तुझ्या हाताला लागू दे . ती लागली तर अजूनही बरेच काही तू देऊ शकशील .

मराठी बोधकथा तात्पर्य : सत्कार्यासाठी दान देणे हा एक संस्कार आहे . तो संस्कार रुजला तर आपल्या जवळची प्रत्येक चांगली गोष्ट समाजाला द्यायची इच्छा होते . पण समाजकार्यासाठी वेळ द्यायची एकदा सवय लागली कि त्यातून समाजकार्यासाठी आपले सगळे जीवन समर्पित करणारे कार्यकर्ते तयार होतात.


6. marathi bodh katha-निस्वार्थी साधू

समाज सेवा हीच ईश्वरसेवा ही पटवून देणारी मराठी बोधकथा 

रामपूर नावाचे गाव होते त्या गावात सर्व काही खुशाल चालले होते.त्या गावाबाहेर एक भगवान शंकराचे प्राचीन मंदिर होते.त्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी दूर दुरून लोक येत असत.

गावाबाहेरच्या त्या एका मंदिरात एक साधुपुरुष कायम वास्तव्य करून राहत होता . त्याला कधी कोणी पूजा अर्धा , ध्यानधारणा करताना पाहिले नव्हते . पण दिवसभर तो गावातल्या कोणाला न कोणाला मदत करत असे .

 एखाद्या शेतकऱ्याला शेतीच्या कामात मदत करी , एखाद्या वयस्क माणसाला जंगलातून लाकडांची मोळी आणून देईकधी एखाद्या आजारी माणसाची सेवा शुश्रुषा करी , तर कधी गावातल्या मुलांचा अभ्यास घेई . कोणी जे देईल ते खाऊन मंदिरात येऊन झोपे .

रोजच्याप्रमाणे बरीच कामे करून साधू मंदिरात येऊन झोपायची तयारी करत होता तेवढ्यात भोवताली दिव्य प्रकाश पसरला . एक देवदूत तिथे आला . त्याच्या हातात एक भली मोठी यादी होती . त्या यादीत तो काही तरी शोधत होता .

 साधूने त्याला विचारले , “ आपण काय शोधत आहात ? " देवदूत म्हणाला , " ही श्रेष्ठ भक्तांची यादी आहे . ज्यांनी आपले सारे जीवन परमेश्वराला समर्पित केले आहे . त्या यादीत तुझे नाव आहे का हे मी शोधत होतो . पण ते कुठे दिसत नाही . " साधू ते ऐकून हसला , शांतपणे झोपायला निघून गेला . 

दुसऱ्या दिवशी पुन्हा असाच प्रसंग घडला . यावेळी देवदूत एक वेगळी यादी घेऊन आला होता . यावेळी साधूने उत्सुकता दाखविली नाही . तेव्हा तो देवदूत म्हणाला , " ही यादी अशा व्यक्तींची आहे कि जे देवाचे लाडके आहेत . त्या यादीत तुझे नाव पहिले आहे .

मराठी बोधकथा तात्पर्य : समाजसेवा हा परमेश्वराची भक्ती करण्याचा सर्वात उत्तम मार्ग आहे .आणि निस्वार्थ पणे सेवा करणारा नक्कीच देवाला आणि सर्वांना आवडतो.


7. marathi bodh katha-भगवान विष्णूचे श्रेष्ठ भक्त कोण 

देवासाठी कोण असतो खरा भक्त-वाचा ही मराठी बोधकथा 

देवर्षी नारद हे भगवान विष्णूंचे परमभक्त . ते सदैव नामस्मरण करत असत . एकदा त्यांच्या मनात आले कि मी सदैव देवाचे नामस्मरण करतो त्याअर्थी सर्वश्रेष्ठ भक्त मीच असणार . ही गोष्ट देवापासून कशी लपणार ? 

एकदा देवानेच नारदांना विचारले , माझा सर्व श्रेष्ठ भक्त कोण ? " नारद म्हणाले " मीच " देवाने सांगितले कि , " नाही . पृथ्वीवरच्या एका छोट्या गावात एक शेतकरी आहे तो तुझ्यापेक्षा श्रेष्ठ भक्त आहे . 

" नारदाला आश्चर्य वाटले . ते गुप्तरूपाने त्या गावात येऊन शेतकन्याच्या साऱ्या दिनक्रमाचे निरिक्षण करू लागले . तो शेतकरी पहाटे लवकर उठे , आंघोळ करून नदीकाठच्या देवळात जाई . देवाला दोन फुले वाहून येई .

मग दिवसभर तो कामात मग्न असे . पाणी भरणे , अंगण झाडून काढणे , तुळशीला पाणी घालणे , बैलांना चारा पाणी करणे , गोठ्याची स्वच्छता करणे . मग बायकोने केलेली भाकरी बांधून घेऊन शेतात जाई व दिवसभर कष्ट करी.

 संध्याकाळी घरी आल्यावर सुध्दा त्याचे काही न काही काम चालतच असे . पण हे सगळे काम करताना तोंडाने नामस्मरण करत असे . 

ते पाहून नारद भगवान विष्णूंकडे जाऊन म्हणाले कि " तुमचे म्हणणे काही खरे वाटत नाही . तो शेतकरी नामस्मरण करतो खरा , पण त्याचे सारे लक्ष दिवसभरातल्या घरच्या कामांतच असते .

" देवाने नारदास म्हटले कि " तुझ्या प्रश्नाचे मी नंतर उत्तर देतो . आधी एक काम कर ही तेलाने काठोकाठ भरलेली वाटी भगवान शंकराकडे नेऊन दे . पण लक्ष दे , थेंबभर सुध्दा तेल सांडता कामा नये . 

" ते काम काही नारदऋषींना अवघड वाटले नाही . ते तेलाची वाटी शंकराकडे पोचवून आले . आल्यावर देवाला सांगितले , कि " एक थेंब सुध्दा सांडलेला नाही .


 देवाने विचारले , " पण जाता येता माझे नामस्मरण केले कि नाही ? " नारद म्हणाले " हे कसे शक्य होते ? माझे सगळे लक्ष त्या तेलाकडे होते . थोडे जरी दुर्लक्ष्य झाले असते तर सांडले असते ना ! " 

देवाने विचारले , " मग आता तूच सांग , रात्रदिवस घरातली सगळी कामे करत राहूनही तो माझे नामस्मरण चुकत नाही . तू मात्र छोटेसे काम करताना मला विसरलास . श्रेष्ठ भक्त कोण ? "

मराठी बोधकथा तात्पर्य- देव कधीही कामधंदा सोडून आपली भक्ती करायला सांगत नाही, कर्म करत राहून फक्त नाम स्मरणातून परमार्थ साधता येतो.




8. marathi bodh katha- व्यापाऱ्याची  शिकवणी

व्यवसायात भांडवल राखून ठेवावेच लागते  हे सांगणारी वाचा मराठी बोधकथा

एक छोटा व्यापारी होता . लाडू तयार करून विकण्याचे काम करायचा . त्याचे भांडवल होतो ८० रु , त्या पैशाने तो सामानसुमान खरेदी करायचा , लाडू तयार करून विकायचा .

 या कामात त्याला १६० रु . मिळायचे . त्यातले ८० रु , घरखर्चासाठी द्यायचा व ८० रु . दुसऱ्या दिवशीचे भांडवल म्हणून बाजूला काढायचा . 

त्या ८० रुपयांत रोजचा खर्च भागवताना फार ओढाताण व्हायची , पण व्यापाऱ्याचा नाइलाज होता . एक दिवस घरच्या सर्वांनी हट्ट धरला कि त्याने १० रा . जास्त द्यावेत . 

मुलाला शाळेचे पुस्तक घ्यायचे होते . मुलीची चप्पल तुटली होती . पत्नीला घरात काही जास्तीची चीजवस्तू आणायची होती . सर्वांची अडचण खरीच होती पण व्यापारी १० रु. जास्तीचे द्यायला तयार होईना . 

तो म्हणाला , " हवे तर आपण एक वेळचा उपास करून १० रु. वाचवू व त्यातून या सगळ्या गरजा भागवू , पण मी भांडवलातले १० रु , काढून दिले तर उद्या आपल्या सर्वांवर भीक मागण्याची वेळ येईल.
 " पण घरच्या सर्वांनी आपला हट्ट लावून धरला व व्यापाऱ्याला १० रु . जास्त द्यायलाच लावले .


 परिणामी त्याचे भांडवल राहिले ७० रु . त्याचे दुसऱ्या दिवशी १४० रु . झाले . ८० रु . घरात खर्च होतच होते . भांडवल राहिले ६० रु . लाडू विकून १२० रु . आले ८० रु . घरात खर्च झाले . भांडवल राहिले ४० रु . त्याचे दुसऱ्या दिवशी ८० रु . आले . 

ते घरात खर्च होऊन गेले व्यापाराला भांडवलच राहिले नाही . परिणामी भीक मागण्याची त्या कुटुंबावर वेळ आली .

मराठी बोधकथा तात्पर्य : जीवनात भांडवल आहे कुटुंब चालवणारे व्यक्ती . योग्य निर्णयाने ने ते भांडवल वाढते . आणखी भांडवल तयार होतात . व्यवसाय चालू ठेवण्यासाठी व त्यांची संख्या वाढवण्यासाठी काही भांडवल राखून ठेवावे लागतातच . ते मूळ भांडवल कमी पडणार नाही याची काळजी घ्यावी लागते.



9. marathi bodh katha-शेतकऱ्याची हुशार सून कोण


मेहनत हीच यशाची गुरुकिल्ली आहे ही सांगणारी मराठी बोधकथा 

एक होता शेतकरी , त्याला तीन मुले . तिघांची लग्ने होऊन सुना घरी आल्या होत्या . त्याची शेतीवाडी खूपच मोठी होती . त्यामुळे तो विचार करत होता कि या सगळ्या शेतीवाडीचा कारभार कुठल्या सुनेकडे सोपवायचा ?

 एक दिवस त्याने तिन्ही सुनांना बोलावून त्यांच्या हातात एकेक गव्हाचा दाणा दिला आणि सांगितले , " हा प्रसादाचा दाणा आहे.नीट जपून ठेवा . मी परत मागेन तेव्हा द्या . " मोठ्या दोन्ही सुना दाणा घेऊन गेल्या य आपापल्या दागिन्याच्या डब्यात तो दाणा त्यांनी जपून ठेवला . 

धाकट्या सुनेने विचार केला कि सासऱ्यांकडे मोठी तिजोरी आहे . तिथे दाणे न ठेवता ते आपल्याकडे कशासाठी दिले असतील ? थोडा विचार करून ती परसात गेली . तिथे तुळशी वृंदावन होते . त्याच्याजवळ तो दाणा जमिनीत पुरून तिने पाणी घातले . रोज ती तुळशीची पूजा करायची तेव्हा त्या दाण्याला पाणी घालायची .

 तिथे तो दाणा रुजला . छान रोप तयार झाले . ते मोठे झाले त्याला एक घोसदार कणीस लागले . दाणे चांगले भरले . त्या कणसातून ओंजळभर गहू मिळाले . 

तिने परसात एक वाफा तयार केला व त्यात ते सर्व गहू पेरून टाकले . गव्हाचे छोटे शेतच , दुसऱ्यावर्षी त्यातून पोतेभर गहू मिळाले . मग तिने नवऱ्याशी बोलून आपल्या शेतातला एक तुकडा हे प्रसादाचे गहू लावण्यासाठी मागून घेतला . 

अशी ७-८ वर्षे उलटली . एके दिवशी शेतकऱ्यानी तिन्ही सुनांना बोलावून गव्हाचा दाणा द्यायला सांगितले . एव्हाना तो दाणा किडून गेला , त्याचा भुसा झाला , तो किडा मुंग्यांनी खाऊन टाकला होता . 

मोठ्या दोघी सुना काही दाणा आणू शकल्या नाहीत . धाकटी सून म्हणाली " प्रसादाचा दाणा आणायला १० बैलगाड्या लागतील . " एका दाण्याचे इतके दाणे झाले होते . शेतकऱ्याने धाकट्या सुनेकडेच सारा कारभार सोपवला .

मराठी बोधकथा तात्पर्य : देवाने प्रत्येकाला काही न काही देणगी दिली आहे . कुणाला छान कुणाला चित्रकला येते . कुणाला उत्तम स्मरणशक्ती आहे तर कुणाला उत्तम शरीरसंपदा . देवाने दिलेली देणगी जर नीट वापरता आली नाही तर निरुपयोगी होते . देवाच्या देणगीचा चांगला वापर केला , त्याचा विकास केला तर माणूस मोठा होतो 


10. marathi bodh katha श्रेष्ठ कोण


देव आणि दानव श्रेष्ठ कोण  हे सांगणारी मराठी बोधकथा


देव आणि राक्षस यांचे वडील प्रजापती , एक दिवस देव आणि राक्षस मिळून प्रजापतीकडे गेले आणि त्यांना विचारले , आमच्यात मोठे कोण ? प्रजापतीने सांगितले कि तुम्ही सारे आज माझ्याकडे जेवायला थांबा , जेवण झाले कि तुमच्या प्रश्नाचे उत्तर देतो .

 देव ३३ कोटी , राक्षसही कितीतरी कोटी ! त्यामुळे प्रजापतीने सुचवले कि आपण दोन पंगती करू . या राक्षसांना प्रत्येक गोष्टीची घाई . ते म्हणाले , " पहिल्या पंगतीला आम्ही येणार " प्रजापतीने सगळी तयारी केली . पाने मांडली , वाढून तयार झाली . 

राक्षस घाईघाईने आले . प्रजापती दुरून पहात होता . राक्षसांनी जेवायला येण्यापूर्वी हातपाय स्वच्छ धुतले नाहीत . सगळे राक्षस पंगतीत बसेपर्यंतही आधी आले त्यांना दम नव्हता . त्यांनी लगेच जेवायला सुरवातही केली . 

तेव्हा प्रजापतीने एक मंत्र म्हटला त्याबरोबर राक्षसांचे हात कोपरात ताठ होऊन गेले . पानातला घास तर उचलला . पण कोपरात हात वाकेना , त्यामुळे घास तोंडात जाईना . तासभर प्रयत्न केला तरी राक्षस उपाशीच राहिले . पंगत संपली , प्रजापतीने लगोलग दुसऱ्या पंगतीची तयारी केली . 

देव स्वच्छ हातपाय धुवून आले . गोंधळ न करता शिस्तीत पानांवर बसले . त्यांनी सामूहिक भोजनमंत्र म्हटला . जेवायला सुरवात करणार तेवढ्यात प्रजापतीने पुन्हा त्याच मंत्राचा प्रयोग केला , देवांचेही हात कोपरात ताठ झाले . घास तोंडात घालताच येईना . देवांनी इकडे तिकडे पाहिले . सर्वांचीच तशी अडचण होती . 

तेव्हा देवांनी एक युक्ती केली . प्रत्येकाने आपल्या शेजारच्या देवाला भरवले . स्वतःच्या तोंडात हात पोचत नव्हता तरी तो शेजारच्याच्या तोंडापर्यंत जात होता . काहीच सांडलवंड झाली नाही . सर्वांचे जेवण अगदी व्यवस्थित झाले . 

सगळे जण नंतर प्रजापतीकडे आले , “ आमच्यात मोठे कोण ? " प्रजापतीने सांगितले कि " मोठेपण हे दिसण्यावरून ठरत नाही . कृतीरून ठरते . जेवताना जे काही घडले त्यावरून आपले आपणच सिध्द झाले आहे कि श्रेष्ठ कोण ? "

मराठी बोधकथा तात्पर्य : जो फक्त स्वतःचे पोट भरण्याचा विचार करतो , तो स्वतःही उपाशीच राहतो व दुसऱ्याच्याही कामी येत नाही . हेच राक्षसांच्या बाबतीत घडले . देवांनी एकमेकांची काळजी घेतली . त्यामुळे सगळेच संतुष्ट झाले . फक्त आपल्या स्वार्थाचा विचार करणाऱ्यांपेक्षा संपूर्ण समाजाच्या हिताचा जे विचार करतात तेच श्रेष्ठ !


 

11. marathi bodh katha-इंद्रियांवर ताबा

एक महात्‍मा रस्‍त्‍यातून घरी चालले होते. वाटेत त्‍यांना एक लिंबू विक्रेता दिसला. लिंबे रसाळ आणि ताजी होती. महात्‍म्‍याच्‍या तोंडाला पाणी सुटले. 

लिंबे खरेदी केली पाहिजेत असे त्‍यांना वाटले. त्‍यांनी लिंबाना निरखून पाहिले, ती स्‍वादिष्‍ट आहेत काय याचीही चौकशी केली पण जिभेच्‍या या चोचल्‍याचा मनाने धिक्‍कार केला. 

लिंबू पाहून तोंडाला पाणी सुटणे हा एक प्रकारचा लोभ आहे आणि तो साधनेच्‍या कार्यात अडथळा निर्माण करतो. महात्‍मा पुढे गेले परंतु त्‍यांचा जिभेचा शौक हार मानत नव्‍हता. त्‍यांची जीभ लिंबांचा स्‍वाद घेण्‍यासाठी आसुसली होती.

 ते परत लिंबूवाल्‍याकडे आले. त्‍याच्‍याकडील लिंबे निरखून पा‍हू लागले. परत एकदा मनाने धिक्‍कार केला आणि हातातील लिंबू खाली टाकून महात्‍मा परतले. चार पावले पुढे गेल्‍यावर परत एकदा त्‍यांच्‍या मनाने उचल खाल्‍ली आणि ते परत लिंबूवाल्‍याकडे आले.

 लिंबूवाला त्‍यांचे हेलपाटे पाहून आश्‍चर्यचकित झाला. त्‍याला हे कळेना की हे महात्‍मा सारखे का हेलपाटे मारत आहेत. यांना खरेच लिंबू खरेदी करायचे आहे की नुसतेच पाहत आहेत. 

शेवटी न राहवून त्‍याने विचारले,''महाराज, तुम्‍हाला जर लिंबे खरेदी करायची असतील तर अवश्‍य करा ना पण नुसतेच हेलपाटे का मारत आहात.'' शेवटी महात्‍म्‍यांनी दोन लिंबे खरेदी केली आणि घरी आले. घरी येताच त्‍यांनी पत्‍नीला चाकू मागितला. 

लिंबांचे दोन तुकडे केले. जसा पहिला लिंबाचा तुकडा तोंडाजवळ आणला तसा मनाने टोमणा मारला,''वा रे वा महात्‍माजी, तू तर या जिभेचा गुलाम झाला. जीभ जशी नाचवेल तसा तू नाचायला लागला. 

ती जे खायला मागेल तसा तू तिला खायला द्यायला लागला. आता तुझी साधना ही विषयांकडे चालली आहे.'' तितक्‍यात त्‍यांची पत्‍नी तिथे आली.

 तिने पतीचा तोंडाजवळ थबकलेला हात पाहून विचारले,''अहो, लिंबाचा स्‍वाद घेता घेता का थांबलात.'' महात्‍म्‍यांनी ते कापलेले लिंबू आणि उरलेले अर्धे लिंबू दोन्‍हीही पत्‍नीच्‍या हातात देऊन तिला सांगितले,'' मी आता हे खाणार नाही कारण आता मी जीभेवर विजय मिळवला आहे. आता मला विश्‍वास पटला आहे की मी इंद्रियावर ताबा ठेवू शकतो.''


मराठी बोधकथा तात्पर्य– इंद्रियांवर ताबा ठेवता येणे ही फार मोठी साधना आहे.



12. marathi bodh katha-दोन वृद्ध दोघांमधील खरा चतुर कोण


एका ठिकाणी दोन वृद्ध बोलत होते...

पहिला वृद्ध : - माझी एक नात आहे, लग्नाची बाकी... 

BE केले आहे, नोकरी करते,

उंची - ५ "२ इंच आहे .. सुंदर

आहे, जर एखादा मुलगा नजरेत

असेल तर सांगा...

दुसरा वृद्ध : - तुमच्या नातीला कुटुंब कसे हवे आहे ... ??

पहिला वृद्ध : - विशेष काही नाही .. बस एक मुलगा, ME/ M.TECH केलेला असावा, स्वतःचे घर असावे, गाडी असावी, घरी AC असावी, घरात बगीचा असावा, चांगली नोकरी, चांगला पगार लाखाच्या घरात असावा...

दुसरा वृद्ध : - आणखी काही…

पहिला वृद्ध :- होय, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तो एकटा असावा.

आई-वडील, भाऊ-बहिण कुणीच नसावेत...

ते काय भांडणं होत असतात ना म्हणून...?

दुसऱ्या वृद्धाचे डोळे भरून आले,

डोळे पुसत तो म्हणाला :- माझ्या एका मित्राचा नातू आहे, त्याचे भाऊ-बहिण नाही आहेत, त्याचे आई-वडिल अपघातात वारले आहेत, चांगली नोकरी आहे, दीड लाख पगार आहे, गाडी आहे, बंगला आहे, नोकर-चाकर आहेत...

पहिला वृद्ध : - मग तर ठरवूनच टाकू,

दुसरा वृद्ध : - पण त्या मुलाचीही अशीच अट आहे की मुलीलाही आई-वडिल, भाऊ-बहिण, किंवा कोणतेही नातेवाईक नसावेत...

बोलता बोलता त्यांचा गळा भरून आला..

मग म्हणाले:- जर तुमच्या कुटुंबाने आत्महत्या केली तरच लग्नाचे जमून जाईल.. तुमच्या नातीचं लग्न त्याच्याशी होऊ शकेल आणि ती खूप सुखी होईल….

पहिला वृद्ध : - हा काय मूर्खपणा आहे, आमच्या कुटुंबाने आत्महत्या का करावी .. उद्या तिच्या सुख, दु:खात कोण तिच्यासोबत, तिच्याजवळ असणार ?

दुसरा वृद्ध:- व्वा रे, माझ्या मित्रा.. स्वतःचे कुटुंब, कुटुंब, आणि दुसऱ्याचे काहीच नाही... माझ्या मित्रा आपल्या मुलांना आपल्या कुटुंबाचे महत्त्व समजावून सांग, घरातले लहान घरातले मोठे सर्वच आपल्या माणसांसाठी महत्त्वाचे असतात... अन्यथा मनुष्य सुख दु: खाचे महत्त्व विसरून जाईल, आयुष्य जगण्यात रसच राहणार नाही…

पहिलावाला वृद्ध लाजेने काही बोलू शकला नाही..

मराठी बोधकथा तात्पर्य- मित्रांनो कुटुंब आहे म्हणूनच आयुष्यातलं प्रत्येक सुख, सुख वाटते , जर कुटूंबच नसेल तर कोणासोबत आपले सुख आणि दु:ख वाटणार?


13. marathi bodh katha-गरीब शेतकरी 


एक गरीब शेतकरी होता.त्याचा कडे कसन्यासाठी थोडीच जमीन होती.तय जमिनीत तो आणि त्याचे कुटुंब घाम गाळून आपल्या गरजा भागवत होते. 

कमी जमीन असल्यामुळे त्याचा फक्त प्राथमिक गरजा भगत असे.या कारणामुळे तो नेहमी दुःखी असे.त्यास वाटे की आपल्याला ही इतरांप्रमाणे जास्त जमीन असावी.

त्यासाठी तो सारखे म्हणत असे कि , “ मला भरपूर जमीन मिळाली तरच मी सुखी होईन.तो नेहमी यांसाठी देवाकडे मागणी करत असे.देवाने ही एक दिवस त्यास दर्शन द्यायचे ठरवले. 

एक दिवस तो सकाळी जागा झाला , तो समोर देवाचेच दर्शन झाले . त्याला खूप आनंद झाला ,आता आपली इच्छा पूर्ण होईल असे त्याला वाटले,त्याने देवाला नमस्कार करून विनंती केली कि देवा मला भरपूर जमीन मिळवून दे . देवाने सांगितले " तू आता पळायला सुरवात कर .

 सूर्यास्त होईपर्यंत तू जेवढ्या जमिनीला फेरी मारून इथे येऊन पोचशील तेवढी जमीन तुझी होईल.असे बोलून देव अदृश्य झाले.शेतकऱ्यास खूप आनंद झाला.त्याने देवाने सांगितल्या प्रमाणे धावण्यास सुरवात केली पण जास्त जमीन मिळवायची त्याची हाव काही सुटत नव्हती त्यामुळे खूप दूरच्या क्षेत्राला वळसा घालत तो कसा तरी सूर्यास्तापर्यंत मूळ जागी आला . 

पण दिवसभरात अविरत धावत राहिल्यामुळे तो एवढा थकला होता कि तिथे पोचल्याबरोबर त्याला रक्ताची उलटी झाली तो खाली पडला व जागच्या जागी मरण पावला . ते पाहून देव पुन्हा आले.

देव म्हणाला , " तो आता जेवढ्या जमिनीवर पडला आहे तेवढ्याच जमिनीची त्याची वास्तविक गरज होती .अश्या प्रकारे शेतकरी ला जमीन मिळाली नाही मात्र स्वतः जीवाने गेला. 

देवाने त्यास पुन्हा जिवंत केले व विचारले आता तुला हवीय का जमीन,तेव्हा शेतकरी बोलला मला क्षमा करा इथून पुढे मी खूप कष्ट करेन. आणि स्वतःच्या जीवावर जमीन घेईल.देव प्रसन्न होऊन अदृश्य झाला.

मराठी बोधकथा तात्पर्य: अतिहव्यास हा विनाशालाच निमंत्रण देतो . अजून एक अर्थ लावता येईल अति तेथे माती




14. marathi bodh katha-जीवनाचे सार

एक विलासी बादशहा होता. तो सर्व प्रकारची व्‍यसने करीत असे आणि आपल्‍याबरोबरच तो प्रधानालाही म्‍हणायचा,'' मनुष्‍य जन्‍म पुन्‍हा पुन्‍हा मिळत नाही, 

त्‍यामुळे आता जो जन्‍म मिळाला आहे त्‍याचा उपयोग करा आणि सर्व प्रकारचे उपभोग करून घ्‍या.'' 

प्रधान हा सन्‍मार्गी माणूस होता. त्‍याला बादशहाच्‍या उपभोगी, चैनी आणि विलासी वृत्तीचे दु:ख व्‍हायचे पण वारंवार समजावूनही बादशहाचे वागणे काही बदलत नव्‍हते.

 बादशहा आपल्‍या मौजमजेच्‍या इतका आहारी गेला होता की त्‍याला आपल्‍या प्रजेची आठवण नसायची. 

प्रजेमध्‍ये बादशहाबाबत असंतोष होता मात्र बादशहा फारच कठोर व निर्दयी असल्‍याने कोणीही काही करू शकत नव्‍हते. एकेदिवशी प्रधानाने केलेल्‍या काही कामामुळे बादशहा फारच खुश झाला.

 त्‍याने दरबारामध्‍ये प्रधानाचा सत्‍कार केला व त्‍याला एक अत्‍यंत भरजरी व मौल्‍यवान अशी शाल भेट म्‍हणून दिली. 

पण प्रधानाने दरबाराच्‍या बाहेर येताच त्‍या भरजरी शालीला आपले नाक पुसले ही गोष्‍ट नेमकी प्रधानाच्‍या विरोधात असलेल्‍या एकाने राजाला जाऊन सांगितली

बादशहाला राग आला, त्‍याने प्रधानाला बोलावून एवढ्या मौल्‍यवान वस्‍तूचा अनादर करण्‍याचे कारण विचारले असता प्रधान म्‍हणाला,'' बादशहा, मी तेच करत आहे जे तुम्‍ही मला शिकवत आला आहात.

'' बादशहा विचारात पडला की आपण असे काय शिकवले. प्रधान परत बोलू लागला,''महाराज, देवाने आपल्‍याला या शालीपेक्षा मौल्‍यवान असे शरीर दिले आहे पण आपण त्‍याचा गैरवापर करत आहात. व्‍यसने, भोग यामुळे या शरीराचा सन्‍मान न होता मोठा अपमानच आपण करत आला आहात.

 तो जेव्‍हा आपणाकडे पाहत असेल तेव्‍हा परमेश्‍वराला किती वाईट वाटत असेल की इतक्‍या मौल्‍यवान शरीराला आपण कशाप्रकारे वापरून त्‍याची घाण करत आहात. 

परमेश्‍वराचा प्रत्‍येक हृदयात वास असतो आणि त्‍याच शरीराला तुम्‍ही वाईट मार्गाने वापरत आहात.'' 

प्रधानाचे हे बोलणे ऐकताच राजाचे डोळे खाडकन उघडले. त्‍याने प्रधानाची क्षमा मागितली व पुन्‍हा कधीही त्‍याने गैरवर्तन केले नाही.

मराठी बोधकथा तात्पर्य– ईश्‍वराने दिलेल्‍या शरीरसंपदेचा योग्‍य मार्गाने वापर केला पाहिजे. मानवाला बुद्धी, विवेक आणि ज्ञान याचे वरदान ईश्‍वराकडून मिळाले आहे. त्‍याचा योग्‍य उपयोग करून तो आपले जीवन सार्थकी लावू शकतो.




15. marathi bodh katha-चांगलें  विचार 



एक रामपूर नावाचे गाव होते.त्या गावा शेजारी खूप मोठे जंगल होते.त्या गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी त्या जंगलातून जावे लागत असे.

अतिशय गरज असेल तेव्हाच लोक शेजारच्या गावात जात असे. त्यामुळे हे जंगल निर्जन होते.जंगलात फक्त जंगली प्राणी असायचे.जंगली प्राण्यामुळे लोकांना आज पर्यन्त कधीच त्रास झाला नव्हता. 

एकदा एक गरीब माणूस जंगलातून फिरत चालला होता.जंगलात दूरवर आणि त्याच्या सोबत कोणीही नव्हते.बरेच अंतर पार केले असताना तो खूप थकला होता . आणि त्याला खूप तहान लागली होती आणि भूकही लागली होती.

एक डेरेदार झाड पाहून तो त्याच्या खाली बसला आणि विचार करू लागला कि आपल्याला इथे कोणी मिष्टान्न भोजन व थंडगार पाणी आणून देईल तर किती बरे होईल ? योगायोगाने तो ज्या झाडाखाली बसला होता तो होता कल्पवृक्ष . 

त्याने इच्छा केल्याबरोबर ती पूर्ण झाली . आणि त्याच्या पंच पक्वानाचे जेवण प्रकट झाले. त्या माणसाला वाटले कि बहुधा देवच प्रसन्न झाला असावा. त्याने प्रार्थना केली कि मला पोते भरून मोहरा मिळाव्यात म्हणजे माझे दारिद्र्य नाहीसे होईल . तीही इच्छा लगेच पूर्ण झाली.

इतक्या मोहरा त्याने आयुष्यात पाहिल्याही नव्हत्या . पण आता त्याला भीती वाटू लागली . या मोहरांच्या लोभाने चोर इथे आले तर काय करायचे ? ते धन तर लुटून नेतीलच , पण आपल्यालाही ठार मारतील .

 हे मनात येताच तिथे चोर आले . आणि त्यांनी मोहरांची पिशवी उचलली आणि त्या गरीब माणसाला ठारही केले . कल्पवृक्षाचे सामर्थ्य न कळल्याने तो हकनाक मरण पावला . या बद्दल आम्हला प्रतिक्रिया नक्की द्या.

मराठी बोधकथा तात्पर्य- आपल्याला मिळणाऱ्या अनुभवाचा जरूर विचार करावा.एखादी संधीचा चांगला उपयोग करून घ्यावा त्या संधीमुळे आपले नुकसान तर होणार नाही असे काही करू नये.कल्पवृक्ष आणि सामर्थ्याची कल्पनाच नसल्याने कार्यकर्ते प्रत्येका ने असे दरिद्री संकल्प करू नये.



16. marathi bodh katha- घुबड आणि टोळ


एक म्हातारे घुबड झाडाच्या ढोलीत झोपले असता एका टोळाने झाडाखाली गाणे म्हणायला सुरुवात केली. त्याने गाणे म्हणू नये म्हणून घुबडाने त्याला विनंती केली, बाबा रे, तू येथून जा, मला विनाकारण त्रास देऊ नकोस. 

तुझ्या किरकीरीने माझी झोप मोडते.' यावर तो टोळ त्या घुबडाचा धिक्कार करून त्याला शिव्या देऊ लागला. तो म्हणाला, 'तू लबाड, चोर आहेस, रात्रीचा बाहेर जाऊन चोरी करून पोट भरतोस नि दिवसा झाडाच्या ढोलीत लपून बसतोस.' 

त्यावर घुबड म्हणाले, 'अरे तू आता आपलं तोंड सांभाळ, नाहीतर मग पस्तावशील.' तरीही टोळ ऐकून घेईना. घुबडाची निंदा करून तो पुन्हा गाऊ लागला, मग घुबडाने त्याची खोटी स्तुती करायला सुरुवात केली, 'बाबा रे, क्षमा कर. 

तुझं गायन अगदी गोड आहे. माझ्या इतका वेळ ते लक्षात आलं नाही. तुझ्यासारखा गाणारा तूच. तुझ्या गाण्यापुढे कोकीळाही लाजेल. तुझा स्वर सारंगीपेक्षा चांगला आहे. बरी आठवण झाली. 

माझ्याकडे एक अमृताची कुपी आहे. त्यातले थोडेसं मी तुला देतो. फार वेळ गात राहिल्याने तुझा गळा अगदी सुकून गेला असेल नाही का ?' टोळाला खरोखरच तहान लागली होती, तो घुबडाजवळचे अमृत घेण्यासाठी त्याच्याजवळ गेला. लगेच घुबडाने त्याला उचलून आपल्या तोंडात टाकले.

मराठी बोधकथा तात्पर्य- आपल्याला जे आवडते ते सर्वांनाच आवडेल असे नाही, हे लक्षात घेऊन दुसर्‍याच्या आवडीनिवडीचा जे विचार करीत नाहीत ते शेवटी आपला नाश करून घेतात.





17. marathi bodh katha-राजा आणि संत

एका वनात दोन संत राहत होते. एकांतात आपल्‍या तपश्‍चर्येत लीन राहत होते. कधीतरी यात्रेकरूंचा जत्‍था जायचा तेव्‍हा ते संत त्‍यांच्‍याशी बोलत असत. त्‍

याच यात्रेकरूकडून त्‍यांना तेथील राजास त्‍या संतांबाबत माहिती मिळाली. तो या दोघांना भेटण्‍यास निघाला. जेव्‍हा संतांना ही गोष्‍ट कळाली.

तेव्‍हा त्‍या दोघांना वाटले की आता राजा येणार व त्‍याने आपला चांगूलपणा पाहिला तर तो आपणास सतत भेटण्‍यास येईल, त्‍याच्‍याबरोबर अनेक माणसे येतील, त्‍यां माणसांच्‍या संगतीने अजून काही माणसे येतील व अशाने या वनातील शांती भंग पावेल व एकांत मिळणार नाही व एकांत नसल्‍याने आपणास ध्‍यानसाधना करता येणार नाही. 

राजा आम्‍हाला दोघांना सामान्‍य माणूस समजेल असे काहीतरी केले पाहिजे. राजाचा लवाजमा तेथे पोहोचला तेव्‍हा राजाने पाहिले की ते दोघेही संत हातात लाठ्याकाठ्या घेऊन एकमेकांशी भांडत होते.

 पहिल्‍या संताने दुस-याला म्‍हटले,'' तू स्‍वत:ला कोण समजतोस, मी इतके ज्ञान मिळविले आहे की ते तू सात जन्‍मातही मिळवू शकणार नाही.'' दुसरा संत त्‍यावर म्‍हणाला,'' अरे तू तर पक्का खोटारडा आहेस, तुझ्या ज्ञानाच्‍या गप्पा मारून तू लहान मुलाला फसवू शकशील पण मला नाहीस. 

तुझ्यापेक्षा जास्‍त ज्ञान मी माझ्या शिष्‍यांना दिले आहे.'' राजाने व त्‍याच्‍याबरोबरच्‍या लोकांनी हे भांडण पाहिले व विचार करू लागले हे साधू संत तर सामान्‍य माणसाप्रमाणेच भांडत आहेत व त्‍यांनी सर्वांनी असल्‍या साधूसंतांचा संग नको म्‍हणून वनातून जाणेच पसंत केले. 

राजा व लोक जाताच दोन्‍ही संतांनी एकमेकांकडे पाहून मंदस्मित केले व गळाभेट घेतली. दोन्‍हीही साधू आपल्‍या साधनेत रममाण झाले.

मराठी बोधकथा तात्पर्य: चांगली गोष्‍ट घडवून आणण्‍यासाठी कधीकधी चुकीच्‍या मार्गाचाही अवलंब करावा लागतो.





18. marathi bodh katha-दानाचे महत्‍व


हजरत उमर आपल्‍या रयतेची खूप काळजी घेत असत. ते स्‍वत:ची व आपल्‍या परिवाराची चिंता नकरता जनतेचे दु:ख निवारणार्थ झोकून देत. 

एका प्रसंगाची गोष्‍ट आहे, काही कारणाने राजधानीत आग लागली, आग इतक्‍या वेगाने पसरली की तिने शहराचा अर्धा भाग व्‍यापून टाकला. लोकांनी खूप पाणी टाकले पण आग आटोक्‍यात येण्‍याची काही चिन्‍हे दिसेनात. 

हजारो लोकांची घरे, दारे, पिके सगळे जळून खाक झाले. मनुष्‍यहानीही मोठया प्रमाणावर झाली. लोकांचा आक्रोश वाढत होता. आगीचा वणवा पसरतच चालला. आगीचे लोळ भडकत चालले. 

शेकडो घरे आगीच्‍या भक्ष्‍यस्‍थानी पडत होती. जनतेला एकाच भयाने ग्रासले होते. आग आटोक्‍यात कशी आणायची कशी, आग विझत नसल्‍याने लोकांनी हजरत उमरला उपाय विचारले, 

तेसुद्धा आग विझविण्‍यात तनमनधनाने व्‍यग्र होते. उमरनी लोकांना सांगितले, ''ही आग म्‍हणजे खुदाचा कोप असावा, तुम्‍ही लोकांनी आता आग विझविण्‍यासाठी पाणी टाकण्‍याचे काम सोडा, गरिबांना अन्नदान करा. कदाचित खुदा यामुळे प्रसन्न होईल आणि आगीपासून आपली सुटका करेल.'


 जनतेतील लोक म्‍हणाले,''हजरत साहेब आपण धर्मादाय संस्‍‍थेचे सर्व दरवाजे सगळ्यांसाठी आधीच उघडे ठेवलेले आहेत. कोणीही गरीब आमच्‍याकडे आला तर आम्‍ही त्‍याला दान करतोच. मग आमच्‍यावर तो नाराज कसा'' 

हजरत उमरने समजावले,''तुम्‍ही जे दान करता त्‍यामागे निष्‍काम भावना नाही. तुम्‍हाला वाटते दानाचे पुण्‍य म्‍हणून तुम्‍हाला सन्‍मान किंवा प्रशंसा हवी असते. 

या देखाव्‍याला पुण्‍यकर्म म्‍हणत नाहीत.'हजरत उमरच्‍या खुलाशानंतर जनतेने आपली चूक सुधारली अन आश्‍चर्य म्‍हणजे आग पूर्णपणे विझून गेली. जनतेने खुदाचे व हजरत साहेबांचे आभार मानले.

मराठी बोधकथा तात्पर्य:- नि:स्‍वार्थ भावनेने केलेले दान कधीही लोकांच्‍या अंतरात्‍म्‍यापर्यंत पोहोचते.



19. marathi bodh katha-गुरु कासव


कोणे एके काळी एका नगरात एक वृद्ध एकटाच राहत होता. छोट्याशा झोपडीत राहून तो आजूबाजूच्‍या शेतात छोटीमोठी कामे करून स्‍वत:ची गुजराण करत असे. 

आपल्‍या गरजा त्‍याने खूपच मर्यादित ठेवल्‍या असल्‍याने त्‍याला फारसा खर्च येत नसे. मात्र हे असताना त्‍याने एक कासव पाळले होते आणि त्‍या कासवावर त्‍याचा फार जीव होता.

 दुपारी आपले जेवण तयार करताना तो कासवासाठी हरभरे भिजवून त्‍याला देत असे. रिकामा वेळ असताना तो त्‍या कासवाशी संवाद साधत असे. आजूबाजूचे लोक त्‍याचे ते कासवप्रेम पाहून हसत असत. 

एके दिवशी एक परिचित मनुष्‍य त्‍याला भेटण्‍यासाठी आला. थोडा वेळ इकडचे तिकडचे बोलून झाल्‍यावर त्‍याने त्‍या कासवाला पाहिले व तो मनुष्‍य म्‍हणाला,'' तू इतका घाणेरडा प्राणी कशासाठी पाळला आहेस. सोडून दे त्‍या कासवाला.'' त्‍याच्‍या बोलण्‍याने वृद्धाला खूप वाईट वाटले.

वृद्ध म्‍हणाला,''अरे मित्रा, तू असे बोलून माझ्या काळजाला हात घातला आहेस. इतके वाईट तर मी कधीच त्‍या कासवाबद्दल माझ्या मनात किंवा स्‍वप्‍नातसुद्धा विचारत आणत नाही. 

ते कासव माझ्या गुरुस्‍थानी आहे म्‍हणून माझ्या मनात त्‍याच्‍याबद्दल खूप आदर आहे.'' तो माणूस म्‍हणाला,''ते कासव तुझे गुरु कसे काय बरे ठरते'' 

वृद्ध म्‍हणाला,'' कासव हे मानवी मनाचे प्रतिक आहे. कासव आपल्‍याला हे शिकवते की त्‍याच्‍यावर जरा जरी संकटाची चाहूल लागली तरी ते जसे स्‍वत:चे अंग आक्रसून कवचाखाली जाते त्‍याप्रमाणेच मानवाने वाईट गोष्‍टींची जराशी चाहूल जरी लागली तरी त्‍यापासून लांब राहिले पाहिजे. 

कासवाप्रमाणे आपण आपल्‍या मनाला वाईट गोष्‍टींपासून अंग चोरण्‍याचा प्रयत्‍न केला तर मानवाचे त्‍यात भले आहे.''

मराठी बोधकथा तात्पर्य-विश्वातील प्रत्येक प्राणी आपल्याला काही ना काही शिकवण देतच असतो. 



20. marathi bodh katha-चांगला राजा

एकदा एका तळ्यातला बेडकांना वाटले, की आपल्याला एक राजा हवा. म्हणून त्यांनी देवाकडे तशी मागणी केली.

 तेव्हा देवाला हसूच आले व त्याने 'हा घ्या राजा !' म्हणून एक लाकडी ओंडका तळ्यात टाकला. तो पाण्यावर पडताच पाणी उसळले. 

ते पाहून सगळे बेडूक घाबरले आणि बाजूला जाऊन बसले. थोड्या वेळाने पाणी शांत झाल्यावर तो ओंडका काही हालचाल करीत नाही असे पाहून त्याच्यावर चढले व उड्या मारू लागले. 

मग त्यांना वाटले की या राजापेक्षा दुसरा चांगला राजा हवा. तेव्हा त्यांनी देवाची प्रार्थना करून दुसरा चांगला राजा पाठवण्याची विनंती केली. देवाने एक बगळा पाठविला. 

त्याने बेडकांना मारून खायला सुरुवात केली. म्हणून बेडकांनी देवाकडे अजून चांगल्या राजाची मागणी केली. 

ते ऐकून देव म्हणाला, 'मी तुम्हांला पहिला राजा पाठवला होता तो तुम्हांला आवडला नाही. आता तुमचं कर्म तुम्हीच भोगा.'

मराठी बोधकथा तात्पर्य- देवाने ज्या स्थितीत ठेवले आहे त्यात समाधानी असावे



21. marathi bodh katha-जगण्याचे भान


एक तरुण माणूस फार छान्दिष्ट व उधळ्या होत्या. त्याने आपली सगळी मिळकत दारू, जुगार सारख्या व्यसनात घालविली. मग तो दरिद्री होऊन भिकार्‍यासारखा अरण्यात फिरू लागला. 

हिवाळ्यात एके दिवशी चांगले कडक उन्ह पडले होते. अशा वेळी तो माणूस नदीकाठी फिरत असता जवळच्या एका आंब्याच्या झाडावर एक कोकिळा बसलेली त्याने पाहिली.

 कडक उन्ह व कोकिळा पाहून त्याला वाटले की, खरंच उन्हाळा आला व आता पांघरुणाची काही गरज नाही, असा विचार करून त्याने आपले काही कपडे गहाण ठेवले व पैसे काढून तो आपल्या मित्राबरोबर जुगाराचा डाव खेळायला गेला.

 तेथे त्याने सगळे पैसे जुगारात घालविले. संध्याकाळी थंडी पडली; तेव्हा त्याला थंडीमुळे आजारपण आले. 

उन्हाळा असून असे कसे झाले याचे आश्चर्य करीत तो पुनः नदीवर गेला तर तेथे तो कोकीळ पक्षी थंडीने गारठून झाडाखाली मरून पडलेला त्याला दिसला. 

तो प्रकार पाहून तो चांगलाच शुद्धीवर आला व मग त्या पक्ष्याला म्हणाला, 'अरे, मी तुझ्यावर विश्वास ठेवून आपले कपडे गहाण ठेवण्याचा मूर्खपणा केला, तू मला फसवलंस आणि स्वतःचाही नाश करून घेतलास.'

मराठी बोधकथा तात्पर्य- व्यसनी माणूस काही वेळा इतका बेसावध असतो की, त्याला सभोवतालच्या गोष्टीचेही भान रहात नाही.



22. marathi bodh katha-अतिरेक नको


एकदा एक राजहंस एका बगळ्यास म्हणाला, 'काय रे तू आधाशी ! पाण्यातला कोणताही प्राणी खायला तू मागेपुढे पहात नाहीस. बरं-वाईट, नासकं हा फरकसुद्धा तुझ्या खादाड जिभेला समजत नाही. 

माझं पहा, मी फक्त पूर्ण उमललेल्या कमळातले तंतु तेवढे खाईन, दुसरा कसलाही पदार्थ माझ्या घशाखाली जाणार नाही.' त्यावर बगळा म्हणाला, 

'माझ्या दृष्टीने असा चोखंदळपणा असणं बरं नव्हे. ज्या वेळी जे मिळेल ते खावं अन् सुखी राहावं. खाण्याचा पदार्थ दिसला की तो खावा हेच शहाणपणाचं. असे म्हणून बगळा उडाला व जवळच्या तलावाकाठी गेला. 

तेथे कडेला एक मासा दिसला. तेव्हा विचार न करता त्याने तो एकदम गिळला, पण आत असलेला गळ घशाला लागून तो जिवास मुकला. राजहंस आपले आवडते खाणे दुसर्‍या कमळे असलेल्या तळ्यात गेला, पण तेथे हंस धरण्यासाठी जाळे लावले होते, त्यात तो सापडला.

मराठी बोधकथा तात्पर्य- कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नको



23. marathi bodh katha-सोन्‍याचा मुकुट आणि चांदीचे पाय

एका मोठ्या शहरात भगवान श्रीविष्‍णुचे मोठे मंदिर होते. रोज अनेक भक्त त्‍या मंदिरात दर्शनासाठी येत असत. 

हळूहळू मंदिराची ख्‍याती वाढू लागली, भक्तांची गर्दी होऊ लागली, मंदिराचा विस्‍तार होऊ लागला मग काही लोकांनी ठरविले

भगवान विष्‍णुला एक सोन्‍याचा मुकुट करावा. त्‍यासाठी निधी गोळा करण्‍याचे ठरविले. गावाच्‍या बाजूलाच एक अनाथ, अपंग मुलांचा आश्रम होता. 

त्‍या आश्रमालाही गावातील काही लोक
दानधर्म करत. गावात भिकुशेठ नावाचे
एक श्रीमंत सावकार राहात होते.


भिकुशेट आपल्‍या पैशातून, नफ्यातून काही वाटा हा दानधर्मासाठी वापरत
असत. भक्तमंडळींना वाटले की भिकुशेटसारखा दिलदार मनाचा माणूस आपल्‍याला मदत करेल. सगळे मिळून भिकुशेटकडे गेले. 

भक्तमंडळीना आपल्‍या पेढीवर आलेले पाहून भिकुशेटला मोठा आनंद झाला. त्‍यांनी भक्तांचा मोठा आदरसत्‍कार केला. लोकांनी भगवान श्रीविष्‍णुसाठी सोन्‍याचा मुकुट करण्‍याचे सांगितले व भिकुशेटकडून मदतीची मागणी केली. यावर भिकुशेट म्‍हणाले,'

'मंडळी मी तुमच्‍या कामात काही मदत करू शकत नाही कारण मी विष्‍णुला सोन्‍याचा मुकुट करण्‍यापेक्षा चांदीचे पाय करण्‍याचा विचार करत आहे.'' लोक म्‍हणाले आम्‍हाला निश्चित
काय ते खरे सांगा.

 भिकुशेट सर्वांना दोन दिवसांनी येण्‍यासाठी सांगितले. दोन दिवस निघुन गेले. लोक पुन्‍हा भिकुशेटच्‍या
पेढीवर गेले असता भिकुशेटच्‍या शेजारी एक लहान मुलगा बसला होता.


भिकुशेटने त्‍या मुलाला उठायला सांगितले. त्‍या मुलाला दोन्‍ही पाय नव्‍हते. मग भिकुशेटच्‍या नोकराने एका पेटीतून
दोन वस्‍तू काढल्‍या ते कृत्रिम पाय होते ते त्‍या नोकराने त्‍या अपंग मुलाला व्‍यवस्थितपणे बसविले. मुलगा हळूहळू चालू लागला.


भिकुशेट म्‍हणाले,'' भक्तांनो, या मुलाचे नाव विष्‍णु, हा अपंग असून अनाथ आहे. याला पाय नव्‍हते म्‍हणून मी शहरातून हे पाय विकत आणले असून तो आता हिंडू फिरू शकतो. त्‍या विष्‍णुला सोन्‍याचा मुकुटाचा तसा फारसा उपयोग नव्‍हता पण 

विष्‍णुला पायांची गरज होती. मी याला दिलेले कृत्रिम पाय याच्‍या दृष्‍टीने सोन्‍याचांदीपेक्षा जास्‍त महत्‍वाचे आहेत.''

मराठी बोधकथा तात्पर्य- मानवसेवा हीच खरी ईश्‍वरसेवा



24. marathi bodh katha-वेळ

लष्‍करातला एक घोडा रस्‍त्‍याने चालला होता. त्‍याच रस्‍त्‍याने पाठीवरून ओझे घेऊन जाणा-या एका गाढवाला घोड्याने पाहिले व म्‍हणाला,

''अरे मूर्ख प्राण्‍या, पटकन बाजूला हो नाहीतर माझ्या पायाखाली फुकट तुडविला जाशील.'' त्‍याचे ते उर्मटपणाचे बोलणे ऐकून ते गाढव निमूटपणे बाजूला झालं पण त्‍या घोड्याचा उमदेपणा व त्‍याचा रूबाब, 

ऐट पाहून ते गाढव मनातल्‍या मनात म्‍हणालं,''देवा, हा जन्‍म मला ओझे वाहणा-या गाढवाचा दिला आहेस पण पुढचा जन्‍म मात्र मला अशा लष्‍करी, उमद्या जातीच्‍या घोड्याच्याच पोटी घाल मात्र याचा उर्मटपणा मला देऊ नकोस.''

थोड्याच दिवसांनी एका लढाईत तो घोडा जखमी झाला व लढाईच्‍या दृष्‍टीने निकामी झाला तेव्‍हा त्‍याच्‍या सरदार मालकाने त्‍याला एका कुंभाराला विकले. 

त्‍या घोड्याच्‍या दुर्दैवाने त्‍याचा मालक व त्‍या गाढवाचा मालक एकच होता. दोघांनाही आता कुंभाराचे साहित्‍य घेऊन बाजारात जाणे भाग असे. 

त्‍या उमद्या पण जखमी घोड्याला आपल्‍यासारखेच ओझे वाहताना, हमाली करताना पाहून आता गाढवाने पुन्‍हा प्रार्थना केली,'' हे देवा, या लष्‍करी घोड्याचा शेवटचा काळ किती कठीण आहे रे,

प्रथम वैभव भोगून हा आता अत्‍यंत कठीण दिवस काढत आहे,
याच्‍या चलतीच्‍या काळात हा उन्‍मत्तपणे वागल्‍यामुळे याच्‍या या परिस्थितीबद्दल कोणालाही याच्‍याबद्दल सहानुभूतीही राहिली नाही.


देवा, असा उद्दाम व उर्मट घोडा बनण्‍यापेक्षा मी आहे तो गाढवच बरा आहे.''

मराठी बोधकथा तात्पर्य:- तुम्‍ही रसिक वाचक कथेतील मर्म जाणून घ्‍याल अशी अपेक्षा आहे.




25. marathi bodh katha-धनाचा विनियोग 

एकदा एक कोल्‍हा जमिनीत बीळ खणत असताना खूपच खोल खणत गेला. खूप खोल गेल्‍यावर त्‍याला तिथे एक धनाचा हंडा दिसला व त्‍यावर एक वृद्ध नाग त्‍या धनाचे रक्षण करत होता.

 कोल्‍ह्याने नागाला विचारले,''हे नागदेवता, तुम्‍ही इथे काय करता आहात.'' नाग म्‍हणाला,'' माझ्या पूर्वजांनी पुरून ठेवलेल्‍या धनाचे मी रक्षण करत आहे.'' मग कोल्‍हा पुन्‍हा म्‍हणाला,'' पण इथं इतकं मोठं धन असताना तुम्‍ही कधी त्‍याचा उपभोग घेतला आहे किंवा नाही. 

उपभोग सोडा थोडंफार धन दानापोटी तरी खर्च केलंत काय'' नाग म्‍हणाला,'' कसं शक्‍य आहे, हे धन कमी होऊ नये म्‍हणून तर मी स्‍वत: या धनाचे रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून रक्षण करत आहे. त्‍याचा उपभोग घेणे किंवा दुस-याला दान देणे ह्यापेक्षा या धनाचे रक्षण करण्‍यातच मला जास्‍त आनंद आहे.''

 हे ऐकून कोल्‍हा नागाला म्‍हणाला,'' मग नागदेवा, तुमच्‍या असल्‍या या श्रीमंतीपेक्षा मी गरीब आहे तोच बरा. ज्‍या धनाचा उपभोग घेतला जात नाही व ज्‍यातून दान केले जात नाही अशा धनाचा काय उपयोग''

मराठी बोधकथा तात्पर्य- ज्‍या धनाचा योग्‍य विनियोग न होता केवळ संचय केला जातो त्‍या धनाचा मनुष्‍यमात्राला काहीच फायदा नाही.




26. marathi bodh katha-दृष्‍टीकोन बदला

एक झाड सुंदर फळाफुलांनी बहरून गेले होते. सुंदरता आणि संपन्‍नतेमुळे पक्षी अधिक प्रमाणात त्‍या झाडावर राहत होते. झाडही आनंदाने आश्रय आणि भोजन देत होते. 

तसेच वाटसरूंना सावली देण्‍याचे कार्यही झाड प्रामाणिकपणे करत होते त्‍यामुळे वाटसरूंचे आशीर्वाद झाडाला मिळत असत.

 त्‍यामुळे झाडाजवळ सदैव प्रसन्‍नता असायची मात्र कालांतराने झाडाला या गोष्‍टीचा गर्व झाला आणि माझ्यासारखे दुसरे झाडच नाही, सगळ्या झाडात मीच श्रेष्‍ठ आहे असा भ्रम त्‍याला झाला. 

काही काळाने झाडाला फळे फुले येण्‍याचे बंद झाले, पानांची गळती सुरु झाली. सावली नसल्‍याने वाटसरू येईनात, फळे नसल्‍याने पक्षी राहिनात अशी अवस्‍था झाली. 

झाडाला वाईट वाटले त्‍याने तेथून जाणा-या एका सिद्धपुरुषाला विचारले की माझ्या आयुष्‍यभर मी सर्वांची सेवा केली पण माझ्या या वृद्धापकाळी माझी कोणी साधी विचारपूस सुद्धा का करीत नाहीत. 

काही लोक तर मला तोडण्‍याची भाषा करत आहेत. सिद्धपुरुष म्‍हणाले, अरे वृक्षराजा, तू विचार करण्‍याची पद्धत बदल, जीवनभर लोकांच्‍या कल्‍याणसाठी राबणारा हा तुझा डोलारा आता तुझ्या मृत्‍युनंतरही उपयोगी पडणार आहे. 

तुझ्या लाकडाचे अनेक उपयोग माणसाच्‍या कल्‍याणासाठी होणार आहेत. मरूनही तू चिरंतन माणसाच्‍या स्‍मरणात राहणार आहेस. 

तेव्‍हा तू तुझ्या मरणाकडे पाहण्‍याचा दृष्‍टीकोन बदल. हे ऐकून वृक्षाला आनंद वाटला व त्‍याने दु:ख न मानण्‍याचे ठरवले.


मराठी बोधकथा तात्पर्य: कोणत्‍याही गोष्‍टीकडे सकारात्‍मक दृष्‍टीने पाहिल्‍यास त्‍यातील चांगल्‍या बाबी लक्षात येतात. मात्र नकारात्‍मक विचारसरणीने नुकसान होण्‍याचीही शक्‍यता असते.




27. marathi bodh katha-वाईट सवयींचा त्‍याग


एक व्‍यापारी होता. तो जितका व्‍यवहारी, विनम्र आणि मनमिळाऊ होता तितकाच त्‍याचा मुलगा उद्धट आणि गर्विष्‍ठ होता. त्‍याला सुधारण्‍याचे अनेक प्रयत्‍न निष्‍फळ ठरले. एकदा ही गोष्‍ट त्‍याने एका मित्राला सांगितली. 

मित्र म्‍हणाला, त्‍याला माझ्याकडे काही दिवस राहण्‍यासाठी पाठवून दे. मी तुझ्या मुलाला ठिकाणावर आणून दाखवेन. त्‍या व्‍यापा-याचा मुलगा मित्राच्‍या घरी राहण्‍यास गेला. त्‍याच्‍या वडिलांच्‍या मित्रांनी त्‍याला अतिशय चांगली वागणूकदिली.

 एकदा ते त्‍याला बागेत फिरावयास घेऊन गेला असता, एक फूट उंचीचे रोप त्‍याला उपटण्‍यास सांगितले. मुलाने ते रोप सहजच उपटले, त्‍यानंतर त्‍याने मुलाला सहा फूट उंचीचे रोप उपटण्‍यास सांगितले, मुलाला ते उपटण्‍यास खूप ताकद लावावी लागली. 

शेवटी ते एका उंच वृक्षाजवळ आले व मित्रांनी मुलाला तो वृक्ष उपटून टाकण्‍यास सांगितला. मुलाने ते शक्‍य नसल्‍याचे सांगितले. त्‍यावेळी मित्रांनी मुलाला उपदेश केला तो म्‍हणजे असा की,

आपण एखादे वाईट कामाला सुरुवात करत असतो तेव्‍हा त्‍यापासून दूर जाणे शक्‍य असते पण मात्र त्‍या कामात जर आपण खोलवर गुंतून गेलो की आपल्‍याला त्‍यापासून सुटका करणे अशक्‍य असते. 

वाईट सवयी किंवा वाईट वर्तनाचे सुद्धा असेच आहे, जोपर्यंत सहज शक्‍य आहे तोपर्यंत वाईट वर्तन किंवा सवय सोडलेली चांगली असते.'' मुलाला त्‍याच्‍या मित्रकाकांचा उपदेश सहजपणेलक्षात आला व त्‍याने चांगले वागण्‍याचे ठरवले.

मराठी बोधकथा तात्पर्य-वाईट सवयी बाळवण्यापूर्वीच त्यांचे निर्मूलन केले पाहिजे 



28. marathi bodh katha-श्रमाचे मोल


गुर्जर नरेश सम्राट कुमार पटलचे गुरु आचार्य हेमचंद्र यात्रेहून राजधानीचे शहर पाटणकडे चालले होते. वाटेत त्‍यांनी एका गावात रात्रीचा मुक्काम केला. 

ते‍थे एका गरीब विधवा महिलेच्‍या घरी ते राहिले होते. त्‍या महिलेने श्रद्धापूर्वक आचार्यांचे आदरातिथ्‍य केले. तिच्‍याकडून शक्‍य तितके चांगले जेवण दिले. ते मोडकेतोडके घर आचार्यांना महालाप्रमाणे भासले. 

दुस-या दिवशी जेव्‍हा आचार्य मार्गस्‍थ झाले. तेव्‍हा त्‍या महिलेने आचार्यांना स्‍वत:च्‍या हाताने कातलेल्‍या सुताची रजई भेट दिली. आचार्यानी ती रजई पांघरूनच नगरात प्रवेश केला.

 सम्राट कुमार पटल यांनी गुरुंचे स्‍वागत केले, परंतु त्‍यांच्‍या अंगावरील सुताची रजई पाहून त्‍यांना वाईटही वाटले. सम्राट म्‍हणाले,''गुरुवर्य, ही जाडीभरडी रजई एखाद्या सम्राटाच्‍या गुरुच्‍या अंगावर शोभून दिसत नाही.

 तुम्‍हाला खरेतर सुख आणि शोभा यांची गरज नाही पण माझ्या गुरुच्‍या अंगावर मौल्‍यवान उत्तरीय असण्‍याऐवजी हे जाडेभरडे वस्‍त्र कसेतरीच दिसते.'' आचार्य हेमचंद्र यांना सम्राटाचा अहंकार त्‍याच्‍या बोलण्‍यात दिसून आला. 

आचार्य म्‍हणाले,'' राजा, या रजईमागे अनेक लोकांचे परिश्रम जोडले गेले आहेत. मला त्‍या परिश्रमांची ऊब हवी आहे. परिश्रम हा खरेतर आपला अभिमान असायला हवा आहे.

 शिवाय त्‍या गरीब भगिनीने ज्‍या प्रेमाने ही रजई मला भेट दिली आहे ती भेट मला तुमच्‍या मौल्‍यवान उत्तरीयापेक्षाही जास्‍त किंमती वाटते.'' आचार्यांच्‍या उत्तराने सम्राटाचा अहंकार गळून पडला व त्‍याने आचार्यांची माफी मागितली.

मराठी बोधकथा तात्पर्य – परिश्रमातून साकार झालेली कोणतीही गोष्‍ट अतिशय मौल्‍यवान असते




29. marathi bodh katha -माणुसकी


संस्‍कृतचे महा‍कवी माघ निर्धन असले तरी मदत करण्‍यास कधीच कमी पडत नसत. त्‍यांच्‍याकडून जितकी मदत गरजूला होत असे तितकी मदत करण्‍यास सदैव तयार असत.

 एकदा क‍वीराज माघ आपल्‍या घरी शिशुपाल वध या महाकाव्‍याचा नववा अध्‍याय लिहीत असताना दरवाजावर कोणाची तरी हाक ऐकू आली.

 कोणी हाक मारली हे पाहण्‍यासाठी ते गेले असता त्‍यांना दारावर त्‍यांच्‍याच गावातील एक गरीब व्‍यक्ती उभारलेली दिसली. त्‍यांनी त्‍या माणसाला आदराने घरात बोलावले. 

त्‍याचे योग्‍य ते आदरातिथ्‍य केले व येण्‍याचे प्रयोजन विचारले असता तो गरीब माणूस म्‍हणाला,'' कविराज मी मोठी आशा ठेवून आपल्‍याकडे आलो आहे. 

माझ्या मुलीचा विवाह ठरला असून त्‍यासाठी मला धनाची गरज आहे. माझी परिस्थिती तर आपण जाणून आहातच. तरी आपल्‍याकडून मला जी मदत होईल ती माझ्यादृष्‍टीने खूप मोठी असणार आहे

महाकवींकडेही आर्थिक चणचण होती. परंतु दारी मदत मागायला आलेल्‍या माणसाला परत पाठविणे त्‍यांना योग्‍य वाटेना. घरात सगळीकडे शोध घेतला पण त्‍यांना त्‍या माणसाला देण्‍याजोगे काहीच मिळेना.

 शिवाय दानवीर माणसाच्‍या घरात मौल्‍यवान असे काय शिल्‍लक राहणार. जे होते ते त्‍यांनी लोकांना देऊन टाकले होते. शेवटी महा‍कवींचे लक्ष पत्‍नीच्‍या हाताकडे गेले. पत्‍नीच्‍या हातात सोन्‍यांचे कंकण होते. 

त्‍यांनी एका हातातील कंकण काढून घेतले व त्‍या गरीब माणसाला देऊन टाकले. 

गरीब माणसाने महा‍कवींचे आभार मानून तो बाहेर पडणार इतक्‍यात कविराजांच्‍या पत्‍नीने त्‍या माणसाला परत बोलावले व आपल्‍या हातातील दुसरे कंकणही त्‍याला दिले म्‍हणाली,''मुलीच्‍या लग्‍नात एकच कंकण कसे तिला देणार तिला रिकाम्‍या हाताने पाठवू नकोस.'' या दांपत्‍याच्‍या दानी वृत्तीला गरीबाने साष्‍टांग नमस्‍कार केला.

मराठी बोधकथा तात्पर्य– आपली परिस्थिती नसतानाही दुस-याला मदत करणे हीच खरी माणुसकी.



30. marathi bodh katha-प्रत्‍यक्ष अनुभव


एका आश्रमात एक महात्‍मा राहत होते. त्‍यांच्‍या आश्रमात रोज सकाळी व संध्‍याकाळी धूप जाळला जात असे. धूपामुळे कीडे, कीटक आदींची संख्‍या कमी होते तसेच वातावरणातील जंतूची संख्‍याही कमी होते हे महात्‍म्‍यांना माहिती असल्‍याने त्‍यांनी धूप जाळण्‍याची पद्धत नित्‍यनेमाने सुरु ठेवली होती.

 आश्रमात धूप जाळला जाई तर आश्रमाच्‍या मागील बाजूच्‍या गोठ्यात कडुनिंबाचा पाला जाळला जाई कारण कडुनिंबाच्‍या पाल्‍याच्‍या धुरानेही कीडे-कीटक येत नाहीत. 

आश्रमातील एका शिष्‍याला मात्र हा भेदभाव पटला नाही. तो महात्‍म्‍यांना जाऊन म्‍हणाला,''गुरुदेव, आपल्‍याला माणसांना मात्र धूपाचा सुंदर वास तर दूधदूभते देणा-या जनावरांना मात्र कडुनिंबाचा कडवट वास असलेला धूर आपण देत आहोत.

 हे काही मला बरे वाटत नाही. तसेही आपल्‍या धर्मानुसार सर्वप्राण्‍यांमध्‍ये एकच परमेश्‍वर वसलेला आहे. आपल्‍या आत्‍म्‍याला चांगला वास आणि पशूंच्‍या आत्‍म्‍याला कडवट वास हे तुम्‍हाला पटते काय'' 

महात्‍मा म्‍हणाले,'' तुझे हे म्‍हणणे मलाही पटते. आजपासून तूच दोन्‍हीकडे धूप जाळत जा आणि एक महिन्‍यानंतर मला येऊन सांग'' त्‍या शिष्‍याने महिनाभर आश्रमात व गोठ्यात दोन्‍हीकडे धूप जाळला. 

सर्वत्र सुवास दरवळला होता. महिन्‍यानंतर तो शिष्‍य महात्‍म्‍यांकडे गेला असता ते म्‍हणाले,'' अरे मुला, आपल्‍या आश्रमाला दोन्‍हीकडे धूप जाळणे हे आर्थिकदृष्‍ट्या परवडत नाही. हे खूप खर्चिक होत आहे. 

तेव्‍हा काय करायचे हे तू बघ'' शिष्‍याने मग काहीच न बोलता दोन्‍हीकडे कडुनिंबाचा पाला जाळणे सुरु केले. किडे,कीटक तर निघून जायचे पण कडवट धुराच्‍या वासाने आश्रमात येणा-या भक्तांची संख्‍या मात्र कमी झाली. 

पंधरा दिवसांनंतर शिष्‍याला हे लक्षात आले व तो महात्‍म्‍यांकडे गेला. त्‍याने महात्‍म्‍यांची क्षमा मागितली व त्‍यांच्‍या आज्ञेनुसार पहिल्‍याप्रमाणे धूप व कडवट पाला योग्‍य ठिकाणी जाळणे सुरु झाले.

मराठी बोधकथा तात्पर्य– प्रत्‍यक्ष अनुभूती मिळाल्‍याशिवाय मनुष्‍य शहाणा होत नाही.




31. marathi bodh katha-आत्‍मज्ञान


एक संत वनात कुटी बांधून राहत होते. कंदमुळे खाऊन ते गुजराण करत असत आणि परमेश्‍वराचे चिंतन करत. वनातून जाणारा कोणी त्‍यांची कुटी पाहून थांबत असे. तेव्‍हा ते त्‍याच्‍याशी प्रेमाने बोलत. 

जे काही जवळ असेल ते त्‍याला खाऊ घालत. एक दिवस एक तरूण त्‍यांना भेटायला आला. त्‍यांच्‍या बोलण्‍याने तो प्रभावित झाला आणि त्‍यांचा शिष्‍य बनून तेथेच राहू लागला. 

संताने त्‍याला तपश्‍चर्या कशी करतात याविषयी माहिती दिली. शिष्‍याने गुरुच्‍या शिकवणीप्रमाणे वाटचाल सुरु केली. गुरुशिष्‍य स्‍नेहभावनेने राहू लागले. 

एकदा संत त्‍याला म्‍हणाले,'' मन मोठे चंचल असते, त्‍याला नियंत्रणातच ठेवले पाहिजे.'' ही गोष्‍ट शिष्‍याच्‍या मनावर ठसली. त्‍या दिवसापासून त्‍याने स्‍वत:ला एका खोलीत बंद करून घेतले.

 संताने त्‍याला विचारले असता शिष्‍य म्‍हणाला की, तो त्‍याच्‍या मनावर ताबा मिळविण्‍याचा प्रयत्‍न करत आहे. शिष्‍य रात्रंदिवस खोलीतच राहू लागला.

 आश्रमात येणा-या जाणा-याकडे तो अजिबात लक्ष देईनासा झाला. एकेदिवशी गुरुने शिष्‍याला खोलीचा दरवाजा उघडावयास सांगितले. गुरु आत आले ते हातात एक वीट घेऊनच. गुरुंनी शिष्‍याला काहीच न बोलता ती वीट एका दगडावर घासायला सुरुवात केली. 

शिष्‍याने विचारले की, गुरुजी हे काय करताय तुम्‍ही. गुरु म्‍हणाले, या विटेपासून आरसा बनवायचा आहे. शिष्‍य म्‍हणाला, गुरुजी असे कसे शक्‍य आहे. 

गुरुजी शांतपणे शिष्‍याला म्‍हणाले,'' ज्‍याप्रमाणे विटेचा आरसा बनू शकत नाही तसे मनाचा आरसा बनू शकत नाही. मन तर धूळ आहे जी आत्‍म्‍यावर पडलेली असते. ती धूळ विसरण्‍याचा प्रयत्‍न केला तरच खरेपणा दिसून येतो.'' शिष्‍याला गुरुची शिकवण समजून आली.

मराठी बोधकथा तात्पर्य– चंचल मनाला नियंत्रणात ठेवूनच प्रगती साधता येते.





32. marathi bodh katha-अहंकाराने पराभव


गंधर्वकुळातील गुत्तिलकुमार नावाचा एक गंधर्व वीणा वादनात सिद्धहस्‍त होता. संपूर्ण वाराणसीत त्‍याची ख्‍याती पसरलेली होती. त्‍याच वेळी उज्‍जयिनीमध्‍ये मुसिल नावाचा एक गंधर्व राहत होता. 

एकदा त्‍याला उज्जयिनीच्‍या राजदरबारात वीणा वादनासाठी निमंत्रित केले होते. मुसिलचे वीणावादन कोणालाच आवडले नाही. त्‍यानंतर मुसिलने गुत्तिलकडे शिकण्‍याचा निश्‍चय केला. मुसिल वाराणसीत गुत्तिलकडे गेला.

 त्‍याने त्‍याचे शिष्‍यत्‍व पत्‍करले. शिक्षण पूर्ण झाल्‍यावर त्‍याने गुत्तिलकडे राजदरबारात काम करण्‍याची इच्‍छा प्रकट केली. गुत्तिलने मोठ्या मनाने राजाशी त्‍याची भेट घालून दिली.

 राजाने गुत्तिलला जेवढे मानधन होते त्‍यापेक्षा अर्ध्‍या मानधनात काम करण्‍याचे सांगितले. मुसिलचा अंदाज होता की आपल्‍यालाही तितकेच मानधन मिळायला कारण आपणही गुत्तिलच्‍या इतके श्रेष्‍ठ कलाकार आहोत.

 राजाने मुसिलला आपली क्षमता सिद्ध करण्‍यास सांगितले. त्‍या स्‍पर्धेत गुत्तिलने एक कठीण तान छेडली जी त्‍याने मुसिलला शिकविली नव्‍हती. शेवटी अशा प्रकारची तान न छेडता आल्‍याने मुसिलला आपला पराभव मान्‍य करावा लागला.

मराठी बोधकथा तात्पर्य: गुरुलाच अहंकाराने आव्‍हान देणे कधीच योग्‍य ठरत नाही.


33. marathi bodh katha-बळी तो कान पिळी

 
एकदा प्राण्यांमध्ये रोगाची साथ सुरू होऊन हजारो प्राणी मरू लागले. आपण फार पाप केल्यामुळे देवाने हा कोप केला आहे असे सर्व प्राण्यांना वाटून त्यांनी आपली वाईट कृत्ये कबूल करायचे ठरविले व जो सर्वात मोठा अपराधी ठरेल त्याने देवाच्या कोपाला शांत करण्यासाठी बळी जावे असे ठरले.

 ठरल्या वेळी सगळेजण हजर झाले व न्यायाधीशाच्या जागी एकमताने कोल्ह्याची निवड केली गेली. प्रथम सिंहाने पुढे होऊन कबुली दिली, ‘मी फार गरीब कोकरांना ठार मारलं, एवढंच नव्हे तर फार भूक लागल्याने एका धनगरालाही ठार मारून खाल्लं.’

 त्यावर न्यायाधीश म्हाराज मोठ्या गंभीरतेने म्हणाले, ‘एखाद्या सामान्य प्राण्याने अशा गोष्टी केल्या असत्या तर नक्कीच मोठा अपराध ठरला असता. पण महाराजांना इतरांपेक्षा जास्त सवलती असतात. मूर्ख बकर्‍या नि एकच धनगर खाणं हा काही मोठा अपराध नाही.’ 

या निकालामुळे हिंस्त्र प्राण्यांनी कोल्ह्याची तारीफ केली. यानंतर वाघ, चित्ता, अस्वल वगैरे प्राण्यांनी आपापल्या कबूली दिल्या व कोल्ह्याने वरीलप्रमाणेच निकाल दिला. शेवटी एक गरीब गाढव पुढे येऊन म्हणाले, 

‘एका शेतकर्‍याच्या इनाम जमिनीतलं मूठभर हिरवं गवत मी खाल्लं. आणि त्याबद्दल मला पश्चात्ताप’ काय पश्चात्ताप ?’ न्यायाधीश झालेले कोल्होबा ओरडले. 

‘अरे पाप्या नक्कीच तुझ्या पापामुळे सध्या हा देवाचा कोप झालेला आहे. यालाच मरणाची शिक्षा योग्य आहे !’ असा निकाल कोल्होबांनी देताच सगळ्यांनी मिळून त्या बिचार्‍या गाढवाला ठार मारले.

मराठी बोधकथा तात्पर्य– बळी तो कान पिळी.



34 . लोभ || मराठी बोधकथा

एक भिकारी होता. तो रोज गावात लोकांना भीक मागायचा. मिळेल ते खायचा. काही मिळाले नाही, तर पाणी पिऊन जगायचा. त्याला या जीवनाचा कंटाळा आला होता.

 त्याला कोणीतरी सांगितले की ‘तू गावाबाहेर नदीकाठी इंद्राची पूजा कर. तो प्रसन्न होईल आणि तुला श्रीमंत करेल’. तो त्याप्रमाणे करतो. इंद्र प्रसन्न होतो.

इंद्र त्याला म्हणतो, की ‘तू तुझी झोळी पुढे कर. मी त्यात पैसे टाकत जाईत. तू जेव्हा थांब म्हणशील, तेव्हा मी थांबेन. मात्र, हे लक्षात ठेव, जर तुझी झोळी फाटली व पैसे खाली पडले तर त्यांची माती होईल. ‍

 तो भिकारी आपल्या झोळीत मावेल एवढेच पैसे घेतो व त्याला थांब म्हणतो. तेवढ्या पैशांवर तो आनंदीत होतो. त्यानंतर तो गावात येतो. चांगले कपडे घेतो, घर बांधतो.

त्याला एक जण विचारतो की तू एकदम कसा श्रीमंत झालास ? तेव्हा तो त्याला सगळी हकीकत सांगतो. त्या माणसालाही पैशांची हाव सुटते. तो सुध्दा गावाबाहेर जातो. 

इंद्राला प्रसन्न करतो. इंद्र त्याच्या झोळीत पैसे टाकायला सुरवात करतो. तो आणखी मागत राहतो. शेवटी पैशाच्या हव्यासापायी थांब म्हणायचे विसरतो. 

त्यामुळे त्याच्या झोळीवर त्या पैशांचा ताण पडतो आणि ती फाटते. सर्व पैसे खाली पडतात व त्यांची माती होते. त्याचबरोबर इंद्रही नाहीसा होतो. त्याच्यापाशी रडण्याशिवाय काहीच उरत नाही.

मराठी बोधकथा तात्पर्य: कोणत्याही गोष्टीचा लोभ नसावा.




35. सेवा हाच धर्म


एका पत्रकारांनी स्वा:मी विवेकानंदांची कीर्ती ऐकलेली होती. स्वाचमी विवेकानंदांना भेटून त्यांतच्यााकडून चार ज्ञानाच्याी गोष्टीह शिकाव्याात अशी त्यांकची तीव्र इच्छाक होती.

त्यां पत्रकारांचे दोन मित्र त्यां्ना भेटावयास आले व बोलता-बोलता स्वायमी विवेकानंदांचा उल्लेतख निघाला. तिघांनी विवेकानंदांना भेटायला जाण्याटचे ठरविले. तिघेही मिळून स्वावमीजींकडे गेले. विवेकानंदांनी तिघांचीही आस्थेिने विचारपूस केली.

यादरम्यादन स्वाआमीजींना असे कळाले की तिघेही पंजाब प्रांतात राहणारे आहेत. त्याा काळात पंजाबात दुष्कातळ पडलेला होता. 

त्यां नी त्याासंदर्भात चर्चा केली. दुष्कांळग्रस्तांडसाठी चाललेल्याा मदतकार्याची माहिती घेतली. त्याहनंतर शैक्षणिक, नैतिक आणि सामाजिक बाबींवर चर्चा केली. ब-याच वेळ चर्चा झाल्या.नंतर तिघेही निघाले.

निघताना पत्रकार महाशय विवेकानंदांना म्हंणाले,”स्वा मीजी, आम्हीच तुमच्यांकडे धार्मिक उपदेश मिळेल या उद्देशाने आले होतो. पण तुम्हीण मात्र सामान्य‍ अशा बाबींवरच चर्चा केलीत.

 आम्हाबला यातून ज्ञानवर्धक असे काहीच मिळाले नाही.” या स्वारमी विवेकानंदांनी मोठे मार्मिक उत्तर दिले ते असे की,” मित्रवर्य, जोपर्यत या देशात एक जरी मूल उपाशी राहिले तर धर्माची चर्चा करण्या पेक्षा त्यावची भूक कशी भागवता येईल हे पाहणे जास्तउ महत्वारचे आहे. 

ज्याआचे पोट भरलेले नाही त्यााला धर्मोपदेश देण्याभपेक्षा भाकरी देणे हे महत्वााचे आहे. 

मराठी बोधकथा तात्पर्य- रिकाम्या पोटी तत्वज्ञानाचा उपदेश उपयोगी नाही.


 आशा आहे तुम्हाला आमची ही मराठी बोधकथा -marathi bodh katha पोस्ट नक्की आवडली असेल या मराठी बोधकथा तात्पर्य- marathi bodh katha tatparya सहित लिहिल्या आहेत ज्या योग्य ज्या लहान मुलांना योग्य असा बोध देतील. लहान मुलांना बाह्य जग जास्त चांगल्या प्रकारे समजण्यास मदत करेल या वेबसाइट वर अशा अनेक सुंदर पोस्ट उपलब्ध आहेत त्या सुद्धा नक्की पहा 



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने